
गेल्या अनेक दिवसांपासून नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून महाराष्ट्रात वातावरण चांगलंच तापलेलं आहे. महाविकास आघाडी सरकारने शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच नाव देण्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्राला पाठवण्याची तयारी सुरु केली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंच नाव देण्यात येईल असे यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील स्थानिकांनी लोकप्रिय नेते दि. बा. पाटील यांचं नाव विमानतळाला देण्याची मागणी केली आहे. यावरून राज्य सरकार विरुद्ध स्थानिक नागरिक असा संघर्ष बघायला मिळत आहे. दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समर्थन समिती, कल्याण डोंबिवलीतर्फे १७ जुलै रोजी डोंबिवलीतील प्रगती कॉलेजच्या हॉलमध्ये विमानतळ नामकरण परिषद झाली आहे.
यामध्ये पनवेलचे उपमहपौर जगदीश गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याने संघर्ष वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी त्यांच्या समर्थकांनी आंदोलन सुरु केलं आहे. दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी सुरु असलेला संघर्ष आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच थांबवला पाहिजे अशी स्थानिकांची मागणी आहे.
जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत लवकर निर्णय घेतला नाही तर मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही. मातोश्रीला घेराव घालण्यात येईल असा संतप्त इशारा उपमहपौर जगदीश गायकवाड यांनी दिला आहे.
आतापर्यंत महाराष्ट्रात अनेक प्रकल्प राबवलेले गेले आहेत. महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात १९ मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नातेवाईकांची नावं विकास प्रकल्पांना दिलेली नाहीत. आज जर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी देखील दि. बा. पाटील यांच्या नावाला विरोध केला नसता असं गायकवाड म्हणाले.
मागील महिन्यात मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत बैठक झाली होती. मात्र त्यांनी दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याबाबत असहमती दाखवल्यामुळे आंदोलन चिघळले आहे. लवकरात लवकर याबाबत निर्णय घेण्यात यावा अशी मागणी देखील गायकवाड यांनी केली आहे.