बापानं पोराच्या नावाने स्टेडियम बांधलं, पोराने त्याच मैदानात पहिल्याच सामन्यात शतक झळकावलं

देशात क्रिकेटचे वेड एका वेगळ्याच उंचीवर आहे. भारतात प्रत्येक दुसरा व्यक्ती हा क्रिकेट चाहता असतोच. भारताने क्रिकेटमध्ये अनेक मोठे विश्वविक्रम आजपर्यंत केले आहेत. पण आज अशा एका विक्रमाबद्दल बोलणार आहोत जो खूपच वेगळा आहे. एका क्रिकेटचाहत्या बापाने एक स्टेडियम बांधलं आहे ते हि आपल्या पोराच्या नावाने. या स्टेडियम मध्ये जो पहिला सामना झाला या सामन्यात त्याच्याच मुलाने पहिलं शतक झळकावण्याचा आगळावेगळा पराक्रम केला आहे. जाणून घेऊया नेमकं काय घडलं..
देशात सध्या रणजीचे सामने सुरु आहेत. पश्चिम बंगालचा रणजी क्रिकेट संघ सध्या डेहरादून येथे उत्तराखंडविरुद्ध सामना खेळत. या सामन्यातून भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेला सलामीचा फलंदाज अभिमन्यू ईश्वरन हाही खेळताना दिसला. अभिमन्यू ईश्वरानं हा भारताच्या टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी एक दमदार दावेदार मानला जातो. कारण त्याने मागील काही वर्षात जबरदस्त कामगिरी केली आहे.
दरम्यान अभिमन्यू ईश्वरन याच्या वडिलांनी डेहराडून येथे एक स्टेडियम बांधलं आहे. ज्याचं नाव दिलं आहे ‘अभिमन्यू क्रिकेट अकॅडमी स्टेडियम’, विशेष म्हणजे अभिमन्यूने या मैदानात पहिला सामना खेळताना पहिल्याच दिवशी शतकी खेळी केली असून नवा विक्रमच रचला आहे. स्वत:च्याच नावाने उभारलेल्या स्टेडियममध्ये अभिमन्यूने आपले शतक झळकावले. त्यामुळे हा
त्याच्या कुटुंबीयांसाठी दुग्धशर्करा योग ठरला आहे.
कोण आहेत अभिमन्यूचे वडील-
अभिमन्यूचे वडिल रंगनाथन परमेश्वरन ईश्वरन व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट असले तरी ते मोठे क्रिकेटप्रेमीही आहेत. त्यांच्या याच क्रिकेटप्रेमाचेच हे फळ आहे. रंगनाथन यांनी २००५ मध्ये डेहरादून येथे मोठी जमीन खरेदी केली होती. या जमिनिवर क्रिकेट स्टेडियम बनवण्याचं त्यांचं स्वप्न होतं. त्यांनी आपल्या मुलाला लहानपापासूच क्रिकेटचे खूप धडे दिले होते. याचंच फळ म्हणजे तो आज भारतीय संघाच्या उंबरठ्यावर आहे.
रंगनाथन परमेश्वरन ईश्वरन यांनी खरेदी केलेल्या जमिनीवर क्रिकेट स्टेडियम बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसेही खर्च केले होते. आज त्याच मैदानावर त्यांचा मुलगा क्रिकेटर बनून फलंदाजीसाठी उतरला आणि पहिल्याच सामन्यात त्याने शतकी खेळी केली. प. बंगालविरुद्ध उत्तराखंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प. बंगालकडून सलामीचा फलंदाज म्हणून अभिमन्यू मैदानात उतरला. पहिल्याच दिवशी प. बंगालने २६९ धावा केल्या. ईश्वरनने २८७ चेंडूत १६५ धावा केल्या. या खेळीत त्याने १४ चौके आणि १ षटकार ठोकला.
दरम्यान, हा सामना खेळण्यापूर्वी ईश्वरनने सामन्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी तो म्हणाला की माझ्यासाठी येथील मैदानावर रणजी सामना खेळणे हा अभिमानाचा क्षण आहे. याच मैदानावरुन मी युवा क्रिकेटर्स बनून क्रिकेटचे धडे गिरवले आहेत. हे मैदान अभिमन्यू ईश्वरन यांच्या वडिलांच्याच मेहनतीचे आणि क्रिकेटप्रेमाचे फळ आहे. घरी येऊन कधीही चांगलंच वाटतं, पण जेव्हा मैदानावर असतो तेव्हा बंगाल संघासाठी मॅच जिंकणं हेच एकमेव लक्ष्य असतं, असेही तो म्हणाला होता.
खेळासाठी केली नाही अभ्यासाची काळजी-
मुलाच्या प्रतिभेवरचा विश्वास म्हणा किंवा त्याचे स्वप्न सत्यात उतरवण्याचे समर्पण म्हणा, आरपी ईस्वरण यांनी सामान्य पालकांप्रमाणे अभिमन्यूवर अभ्यासासाठी कधीही दबाव आणला नाही. अभिमन्यूची प्रतिभा आणि त्याची क्रिकेटची आवड ओळखून आरपी ईश्वरनने त्याला खेळण्यासाठी केवळ प्रोत्साहनच दिले नाही तर त्याला देशाच्या कानाकोपऱ्यात नेले.
मुलाच्या खेळात अडथळे येऊ नयेत म्हणून सुरु केली क्रिकेट अकादमी
आरपी इसवरनने सांगितले की, ते स्वतः क्रिकेटर आहे. मुलाची आवड पाहून त्यांचे क्रिकेटवरील प्रेम पुन्हा जागृत झाले. त्यावेळी डेहराडूनमध्ये आधुनिक सुविधा असलेले एकही क्रिकेट स्टेडियम किंवा मैदान नव्हते. अशा परिस्थितीत अभिमन्यूच्या सरावात अडचण आली. यासाठी त्यांनी 2005 साली आपल्या जमा झालेल्या भांडवलातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधांनी स्वतःची क्रिकेट अकादमी बनवली. त्याच्या मुलाच्या नावावरून त्याचे नाव अभिमन्यू क्रिकेट अकादमी ठेवण्यात आले. इथूनच अभिमन्यूने क्रिकेटच्या मूलभूत गोष्टी शिकल्या.