केव्हा दूर होणार महाराष्ट्र सरकारवरील संकट? नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितले..

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारसमोरील संकटावर भाष्य केले आहे. महाराष्ट्र सरकारवरील संकट लवकरच संपेल, असे नितीन गडकरी म्हणाले. यावेळी तुम्ही हे संकट दूर कराल का? असा प्रश्न विचारला आला असता, गडकरी म्हणाले, “आगे-आगे देखो होता है क्या.”
गडकरी म्हणाले की, आजच्या समस्येत उद्याची उत्तरे दडलेली आहेत. सर्व प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील.ढग दूर होतील. अंधकार नाहीसा होईल आणि सूर्य उगवेल. यावर मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर घोंगावणारे ढग दूर होतील का? आपले आणि त्यांचे संबंध अगदी जवळचे आहेत, असे मानले जाते? असा प्रश्न केला असता, गडकरी म्हणाले, वेयक्तीक संबंध, हे राजकीय संबंधांपेक्षा वेगळे असतात. मग ते सरकारमध्ये असोत अथवा नसोत. संबंध तसेच असतात. ते झी टीव्हीच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा उल्लेख करून गडकरी म्हणाले, ते (वाजपेयी) म्हणाले होते, सरकार येतात आणि जातात, पक्ष बनतात आणि संपतात, पण देश हाच असतो. प्रत्येकाला देशासाठी काम करायचे असते. भारताला महासत्ता बनण्यासाठी काम करायचे आहे. चालत राहायचं, हा निसर्गाचा नियम आहे.
महाराष्ट्र सरकारवरील संकटामागे भाजप आहे का? गडकरी म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या राजकारणावर मी अधिक भाष्य करणार नाही. मात्र, शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र आल्यास माझ्यासारख्या व्यक्तीला नक्कीच आनंद होईल, हे मी नक्की सांगेन.